डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन   

पुणे : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञानवादी साहित्यिक आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) संस्थापक डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन कन्या, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 
डॉ. नारळीकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना कोणतेही दीर्घ आजारपण नव्हते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते. 
 
डॉ. नारळीकर यांचे पार्थिव आज (बुधवारी) सकाळी ११ वाजता आयुका येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांची एक कन्या परदेशात आहे. ती परतल्यानंतर डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
 
डॉ. नारळीकर याचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसीमध्ये झाले. १९५७ मध्ये विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना बी.ए., एम. ए. आणि पीएच. डी.च्या पदव्या मिळाल्या. तसेच, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व अन्य अनेक बक्षिसे मिळाली. खगोलशास्त्रातील संशोधनामुळे त्यांना जगभरात मान्यता मिळाली. 
 
प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले. तसेच, त्यांच्यासोबत हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला.  
 
१९६६ मध्ये नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी झाला. १९७२ मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून कामाला सुरूवात केली. पुण्यातील ’इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या त्रसंस्थेची स्थापना त्यांनी १९८८ मध्ये केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.ते लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके तसेच विपुल साहित्य संपदा लिहिली. नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अस्वथ्यामुळे प्रत्यक्ष साहित्य संमेलनात त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. डॉ. नारळीकर यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
 
तीन वर्षाचे काम सहा महिन्यांत
 
प्रा. फ्रेड हॉयल यांनी नारळीकर यांना संशोधनाचा एक विषय दिला. त्या कामामुळे नारळीकर यांना अमेरिकेला जावे लागले. या संशोधनासाठी तीन वर्षे लागतील, असा प्रा. फ्रेड यांचा अंदाज होता. मात्र, नारळीकर यांनी सहा महिन्यांत संशोधन पूर्ण केले. आता पुढे काय? असा प्रश्न पडला असतानाच केंब्रिजमधील रेडिओ अ‍ॅस्ट्रानॉमर प्राध्यापक मार्टिन राईल यांनी निरीक्षणातून एक जाहीरनामा काढला. त्यानुसार, प्रा. फ्रेड हॉयल यांचा स्थिर स्थितीचा सिद्धांत रद्दबातल ठरत होता. हे आव्हानच होते. प्रा. फे्रड यांनी नारळीकर यांना सोबत घेऊन प्रा. राईल यांच्या दाव्यातील सत्यता तपासली. त्यात प्रा. फे्रड यांच्या सिद्धांताला कोणताही धोका नसल्याचा निष्कर्ष निघाला. हा निष्कर्ष नारळीकर यांनी रॉयल अ‍ॅस्ट्रानॉमिकल सोसायटीपुढे सादर केला. ते उत्तर सोसायटीने मान्य केले. त्यातून जयंत नारळीकर यांना प्रचंड विश्वास प्राप्त झाला. 
 
न. चिं. केळकर पुरस्काराने सन्मान 
 
‘केसरी’चे माजी संपादक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या स्मरणार्थ केसरी-मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारे केळकर पारितोषिक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकाला केळकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, १४ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रदान करण्यात आले होते. ‘केसरी’चे विश्वस्त व माजी संपादक जयंतराव टिळक यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा श्री शिवाजी मंदिरात पार पडला होता. माजी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 

Related Articles